सातारा – ऑगस्ट महिन्यात सलग पंधरा दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने सांगली, कोल्हापूरसह सातारा जिल्ह्यातही काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पावसाने गेले काही दिवस विश्रांती घेतली होती. मात्र पुन्हा गणेश चतुर्थीनंतर पावसाने सुरुवात केल्याने नद्यांसह धरणांमधील पाणी पातळी वाढली. त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. मात्र सोमवारपासून पावसाचा जोर कमी झाला असून मंगळवारी अधूनमधून येणारी पावसाची एखाददुसरी सर वगळता दिवसभर पावसाने उघडीप दिली होती.
गेल्या महिन्यात पावसामुळे जिल्ह्यात कराड, पाटणमध्ये मोठ्या प्रमाणात पुरस्थिती निर्माण झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पूरग्रस्त नागरिक स्वत:चे संसार कसेबसे सावरु लागले असतानाच गणेश चतुर्थीपासून पुन्हा रिमझिम पावसाने सुरुवात केली. त्यामुळे कोयनेसह इतर धरणांमधील पाण्याची आवक वाढल्याने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यामुळे पाटण तालुक्यात काही गावांमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, सोमवारपासून पावसाचा जोर ओसरला आहे. मंगळवारी दिवसभर हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला असला तरी अधूनमधून उनही पडत होते. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.