पुणे – देशातील काही राज्यांमध्ये जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर आणि दरड कोसळण्यामुळे प्रचंड नुकसान झाल्याचे पहायला मिळाले. जुलै महिन्यातच पावसाची ही अवस्था असल्यानंतर पुढील दोन महिने पाऊस कसा असेल? अशी चिंता अनेकांना लागली होती. याबाबत भारतीय हवामान विभागाने दिलेल्या “सामान्य’ पावसाच्या अंदाजामुळे दिलासा मिळाला आहे.
भारतीय हवामान विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या मासिक दीर्घकालीन अंदाजामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशांत बहुतांश ठिकाणी पाऊस सामान्य राहणार असून, सरासरीच्या 94 ते 106 टक्के असेल, अशी शक्यता वर्तविली आहे. विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी हा अंदाज जाहीर केला आहे.
या अंदाजानुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये, भारतात पाऊस हा सरासरी 428.3 मिमी असतो. यंदा या दोन्ही महिन्यात सरासरीपेक्षा किंचित कमी प्रमाणात पाऊस पडेल. जुलै महिन्यात मान्सूनची हालचाल सामान्यापेक्षा कमी राहील. तसेच महाराष्ट्र, जम्मू -काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भूस्खलन, आणि गंभीर पूर निर्माण झाली होती. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी राहणरा असल्याने या राज्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्यात मध्य प्रदेश, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, दक्षिण छत्तीसगड आणि लगतच्या विदर्भ, अरुणाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये सामान्य पावसापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मान्सूनच्या उत्तरार्धात म्हणजेच सप्टेंबर महिन्यात, महाराष्ट्रात विशेषतः किनारपट्टी भागातील जिल्हे, संपूर्ण दक्षिण भारत, मध्य प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेशचा काही भाग, उत्तर जम्मू आणि काश्मीर आणि पश्चिम गुजरातच्या शेवटपर्यंत सामान्यपेक्षा अधिक पावसाचा अंदाज विभागाने वर्तविला आहे.