सगळेच चिंतेत : धरणात केवळ 37.20 टक्के साठा
मंचर – आंबेगाव तालुक्यातील हुतात्मा बाबू गेणू सागरातील (डिंभे धरण) पाणीसाठा कमालीचा खालवला आहे. गेल्यावर्षी धरण आजच्या दिवशी 88 टक्के भरले होते. तर यंदा केवळ 37.20 टक्के पाणीसाठा आहे. त्यातच पावसाने दडी मारल्याने यंदा धरण भरेल किंवा नाही, याबाबत नागरिक साशंक आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात गेल्यावर्षी एक हजार चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. तर यावर्षी आत्तापर्यंत एकूण 390 मिलीमीटर पाऊस झाला आहे.
गेल्या वर्षी जून, जुलै या महिन्यात भीमाशंकर, आहुपे खोऱ्यात आणि खेड तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागात मुसळधार पाऊस झाला होता, त्यामुळे डिंभे धरणासह खेड तालुक्यातील तिनही धरणे जवळपास भरली होती. आंबेगाव आणि शिरूर तालुक्यात घोडनदीवर असलेले 25 आणि मीनानदीवर असलेले 12 कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर पावसाचा अंदाज घेऊन लोखंडी ढापे बसवावेत, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे, त्यामुळे पाणीसाठा शिल्लक ठेवण्यास मदत होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
- गेल्या वर्षी व यंदाचा धरणातील साठा (टक्क्यांमध्ये)
धरण… दि. 1 ऑगस्ट 2019…4 ऑगस्ट 2020
कळमोडी… 100…47.42
चासकमान…98.26…18.09
भामा आसखेड…92.92…44.36
डिंभे… 86.03…37.20
घोड…40…43.75