चिंबळी -इंद्रायणी नदीवर देहू ते मरकळ या ठिकाणी जवळपास सहा ते सात बंधारे बांधले आहेत. या परिसरात उन्हाळ्यात शेतीला व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून सरकारच्या वतीने दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की बंधाऱ्यांना ढापे टाकून पाणी आडविले जाते; परंतु त्याआधीच यावर्षी येथील नदीपात्राला जलपर्णीने वेढले असल्यामुळे पात्रातील पाणी दूषित झाले आहे .
हवेली आणि खेड तालुक्यातील श्रीक्षेत्र देहू आणि आळंदी या पुण्यभूमीमध्ये असलेल्या चिखली, तळवडे, मोई, मोशी, चिंबळी, डुडूळगांव, केळगांव, चऱ्होली, गोलेगांव, मरकळ आदी ठिकाणच्या गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी, पिण्यासाठी, तसेच जनावरांसाठी या पाण्याचा फायदा होतो.
मात्र, सध्याच्या जलपर्णीबरोबरच पिंपरी-चिंचवड हद्दीतील तळवडे, चिखली, एमआयडीसीचे साडपांणी आणि रसायनमिश्रित तेलकट पाणी थेट या इंद्रायणी नदीत सोडले जाते असल्यामुळे नदीचे पाणी दूषित आहे .
हवेली आणि खेड तालुक्याच्या हद्दीतून चिंबळी व मोशी या दोन्ही गावांमधील इंद्रायणी नदीवर राज्याच्या वतीने बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याजवळ नदीपात्रातील पाणी काळपट व साबणासारखा फेस निर्माण झाला आहे, त्यामुळे डासांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या परिसरात इंद्रायणी नदीवर प्रत्येक वर्षी अशी स्थिती निर्माण होत असून त्यामुळे या भागातील नदीकाठच्या रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतो.
यासाठी वाढत्या जलपर्णीचे नियोजन करून पिंपरी-चिंचवड एमआयडीसीच्या हद्दीतील चिखली एमआयडीसीचे साडपांणी आणि तेलमिश्रित रासायनिक पाणी नदीपात्रात सोडू नये, यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
प्रशासन कारवाई नाही
महापालिका प्रशासन व अधिकाऱ्यांकडून अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे इंद्रायणी नदीत रसायन मिश्रित पाणी सोडण्यात येणाऱ्या कंपनीवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे अशा कंपनीधारकांना कोणत्याही प्रकारचा वचक राहिला नसून ते रसायनमिश्रीत पाणी नदीत सोडत आहेत. याबाबत वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.