पुणे – राज्यात गेल्या आठवड्यापासून उघडीप दिलेला पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. येत्या दोन दिवसांत कोकण, विदर्भात जोरदार, तर मध्य महाराष्ट्र अणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बरसणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यातील बहुतांश भागात प्रामुख्याने कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राटील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने ऑगस्ट महिन्यात चांगली हजेरी लावली होती.
मात्र, गेली आठवडाभर राज्यातील पावसाचा जोर ओसरला होता. मात्र, झारखंड आणि आसपासच्या भागात कमी दाबाचा पट्टा तसेच चक्रीय स्थिती कार्यरत आहे. त्यामुळे मध्य प्रदेश आणि विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
याबरोबरच अरबी समुद्रात बाष्पयुक्त वारे तयार झाले आहे. हे वारे पुढील दोन दिवस ईशान्य भारताकडे वाहणार आहे. यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस बरसण्याचा इशारा देण्यात आला आहे.
विशेषत: पुणे आणि नाशिक भागातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस बरसेल. ही स्थिती 29 ऑगस्टपर्यत राहणार आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.