विदर्भ आणि मराठवाड्याचा भाग वगळता राज्यात पावसाने थैमान घातले आहे. मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांना त्याचा जोरदार तडाखा बसला आहे. त्यानंतर नाशिक आणि पुण्याकडेही पावसाची वक्रदृष्टी पडल्याचे गेल्या आठवड्यात पाहायला मिळाले. या दोन जिल्ह्यांच्या शहरी भागांत विशेष आपत्कालीन स्थिती नव्हती. मात्र, धरणक्षेत्रात झालेल्या कोसळधारेने शहरी भागांतही दैना उडाली. धरणांची कमाल मर्यादा ओलांडल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. त्याचे प्रमाण फार असल्यामुळे नदी पात्र ओलांडून पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरल्याचे पुण्यात पाहायला मिळाले.
अनेक कुटुंबांना विस्थापित व्हावे लागले. महापालिकेच्या शाळांमध्ये आश्रय घ्यावा लागला. मंगळवारी काहीशी स्थिती सुधारत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. धरणांमधील विसर्गही कमी करण्यात आला होता. मात्र, बुधवारी धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच राहिल्यामुळे पुन्हा विसर्ग वाढवण्यात आला. बारामती-इंदापूरचा पट्टा वगळला तर पुणे जिल्ह्यात चांगलाच पाऊस झाला आहे. एरव्ही नेहमी पावसाच्या नावाने रडगाणे गाणारे काही पुणेकर यंदा प्रथमच त्याच्या अविश्रांत माऱ्याला चांगलेच वैतागलेले दिसले. मात्र या पावसाचा सगळ्यांत जबरदस्त तडाखा बसला आहे, तो सातारा, सांगली, कराड, पाटण, कोल्हापूर या भागाला. कोल्हापुरात हाहाकार माजल्याची स्थिती आहे.
सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ येथे पुरात अडकलेल्यांना सुरक्षित ठिकाणी नेत असणाऱ्या बोटीवरच काळाने झडप घातली. त्यात काही जणांना जीव गमवावा लागला. केवळ येथेच नाही तर पुण्यात आणि जेथे जेथे पावसाचा कहर सुरू आहे, त्या राज्याच्या उर्वरित भागातही पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये अनेक प्राण गेले. हा आकडा एकत्रित केला, तर त्याने शंभरी केव्हाच गाठली आहे. त्याची सुरुवात जुलैच्या सुरुवातीपासूनच झाली होती आणि आता ऑगस्टच्या मध्यापर्यंत पावसाने झोडपलेल्यांची संख्या वाढतच चालली असताना दिसतेय. कोयना धरणापासून ते उजनी धरणापर्यंत सगळीच धरणे पूर्णक्षमतेने भरली आहेत. त्यांच्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्यामुळे आसपासच्या गावांना पुराचा फटका बसला आहे.
इतकेच नव्हे, कायम दुष्काळी म्हणून इतिहासात नोंद असलेल्या उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांतील धरणेही पूर्ण भरली आहेत. शहरांमध्ये पावसाचा थेंब नाही. मात्र, नद्यांना पूर असे काहीसे विचित्र चित्रही यावेळी पाहायला मिळते आहे. उन्हाळ्यात ऊन पडते, हिवाळ्यात थंडी वाजते तर पावसाळ्यात पाऊस येतोच असे म्हणून दुर्लक्षित करण्याचा हा विषय नाही. गेल्या काही काळापासून सातत्याने आपत्तींना सामोरे जावे लागत आहे. बरे त्या आपत्तीतही एकवाक्यता अथवा एकसूत्र किंवा समानता नाही. तेथेही प्रचंड विरोधाभास आहे. एकदम प्रखर दुष्काळ आणि हाहाकार माजवणारा पूर अशी विसंगत स्थिती निर्माण होते आहे. गेल्याच वर्षी राज्य कोरडे होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकूण 358 तालुक्यांपैकी दीडशे तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला होता.
नव्या कॅलेंडर वर्षाची सुरुवातच भीषण पाणीटंचाईने झाली होती. काही तालुक्यांत तर डिसेंबरपासून पाण्याची ओरड सुरू झाली होती. पाणी नाही, जनावरांना चारा नाही आणि हाताला काम नाही अशा तिहेरी कात्रीत सापडल्यावर ग्रामीण भागातील नागरिक शहरांची वाट धरतो. त्यामुळे शहरांचाही समतोल बिघडतो. मात्र, येथे हा विषय नाही. जानेवारीपासून प्रशासकीय यंत्रणा गलितगात्र झाली असताना जूनमध्ये येणारा मान्सूनही लांबला. त्यामुळे पावसाची वाट पाहणारी यंत्रणा पुरती हवालदिल झाली. तो पाऊस जूनच्या अखेरीस आला. आला म्हणजे केवळ आला म्हणावे इतपतच त्याची उपस्थिती नोंदवली गेली. त्यानंतर त्याने जी पाठ फिरवली ती जुलै महिना अखेरपर्यंत. प्राण कंठाशी आल्यानंतर त्याने जुलैला पुनरागमन केले. नंतर जो जोर धरला तो आतापर्यंत कायम आहे.
पावसाची लहर आणि निसर्गाचा कहर वगैरे भाकड गोष्टी सांगाव्यात असाही आताचा काळ नाही. जे काही होते आहे, ते निसर्गाचे चक्र बिघडल्यामुळे. “अति सर्वत्र वर्जते’ म्हणतात. मात्र मानव हा एकमेव प्राणी असा आहे, त्याची हाव कधीच संपत नाही. त्यामुळे अति झाले आहे का, आणि आता थांबायला हवे का, अशा कोणत्याच गोष्टीचा तो विचार करत नाही. निसर्गात मानवाचा हस्तक्षेप वाढला तेव्हापासून संकटे येण्यास सुरुवात झाली आहे. ग्लोबल वॉर्मिंग अर्थात जागतिक तापमान वाढ हे त्यापैकीच एक असलेले महासंकट. ते आले आहे आणि लवकर जाण्याची सुतराम शक्यता नाही. ते उपद्रव करणार आहे. तो रोखता येण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे. त्याचा उपद्रव कमी होईल यासाठी सामूहिक प्रयत्न करणे एवढेच आज हातात आहे.
स्टीफन हॉकिंग यांच्यासारख्या द्रष्ट्या शास्त्रज्ञानेही धोक्याचा इशारा दिला होता. येत्या शंभर वर्षांत पृथ्वी ही राहण्यायोग्य राहिलेली नसेल. आपल्याला नव्या ठिकाणाचा शोध घ्यावा लागेल अशा आशयाची भीती त्यांनी साधार व्यक्त केली होती. आज त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे का, असा प्रश्न पडतो. बरेच जिल्हे असे आहेत की जेथे गेल्या दशकभरात पाऊसच झालेला नाही. तर बऱ्याच जिल्ह्यात पाऊस थांबायचे नाव घेत नाही. जेथे पावसाच्या कालखंडात पाऊस पडत नाही, तेथे अवकाळी पाऊस मात्र तुफान बरसतो. विदर्भ आणि मराठवाड्याने ते गेल्या दोन-पाच वर्षांत सातत्याने अनुभवले आहे.
चार महिने एका ठराविक पॅटर्नने पाऊस पडतोय असेही होत नाही. तीन महिने गायब आणि आठवडाभरात आभाळ फाटल्यासारखा कोसळणे आणि त्यातही कोणती लय नसणे, हे सगळे बिघडलेल्या चक्राचेच फलित आहे. त्यातही अशा स्थितीचा मुकाबला करण्याची सज्जता नाही. पाण्याचा निचराच होऊ शकत नाही. मुंबईत 2005 मध्ये झालेल्या ढगफुटीचे उदाहरण आजही दिले जाते. मात्र, ज्या प्रकारे त्या शहरात किंवा अन्य शहरांतही कॉंक्रिटचे जंगल उभे राहिले आहे आणि लोकसंख्येचा स्फोट होतो आहे, तो पाहता आगामी काळात दिवसाला पन्नास मिमी पाऊस पडला तरी शहरांमध्ये घुसलेले पाणी बाहेर पडणे अवघड होऊन जाईल अशी भीती जगभरातल्या तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.
भविष्यातील या धोक्याचा वेध घेणे, वर्तमानातून धडा घेणे आणि शहरांचे व तेथे राहणाऱ्या लोकसंख्येचे सुयोग्य नियोजन करणे, निसर्गावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न न करणे, जेथे नैसर्गिक प्रवाह आहेत तेथे विनाकारण ढवळाढवळ करणे कटाक्षाने टाळणे अशा काही मोजक्याच बाबी सध्या तरी प्रशासनाच्या आणि सगळ्यांच्याच हातात आहेत. त्या जरी पाळल्या तरी बरेच सुसह्य होणार आहे. अन्यथा हवासा वाटणारा पाऊस कायमच संकटांची मालिका घेऊन येणाऱ्या एखाद्या यमदूतासारखाच भासत राहील.