प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 14 – खडकवासला प्रकल्पात पावसाचा जोर कमी झाल्याने खडकवासला, पानशेत आणि वरसगाव या तीन धरणांतून विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्यस्थितीत खडकवासला धरणातून 7 हजार 276 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. खडकवासला प्रकल्पात एकूण पाणीसाठा 99 टक्के म्हणजे 28.77 टीएमसी इतका उपलब्ध आहे. आतापर्यंत खडकवासला धरणातून मुठा नदीत 7 टीएमसी इतके पाणी सोडण्यात आले आहे.
सध्यस्थिती पानशेत धरणातून 2 हजार 704 क्युसेक, वरसगावमधून 2 हजार 664 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. या दोन धरणातून सोडण्यात येणारे पाणी खडकवासला धरणात जमा होते. खडकवासला धरणातून रविवारी दुपारी 9 हजार 416 क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. खडकवासला धरणात रविवारी दिवसभर 1 मिमी, पानशेतमध्ये 9 मिमी, वरसगावमध्ये 10 मिमी आणि टेमघरमध्ये 20 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.