सातारा -विजांच्या कडकडाटासह बुधवारी सातारा शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन ओलेचिंब झाले. दिवसभर साताऱ्यात पावसाचा रुद्रावतार सातारकरांना अनुभवायास मिळाला.
हंगामात सरासरीच्या सोळा टक्के पाऊस जास्त झाल्याने जिल्ह्याला परतीच्या पावसाची अपेक्षा होती. बुधवारी जिल्ह्याच्या सहा तालुक्यांत पावसाने जोरदार बॅटिंग केली. सातारा, कराड, जावळी, महाबळेश्वर, वाई, पाटण या अतिपावसाच्या तालुक्यांत मुसळधार पाऊस झाल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. सातारा शहरात ढगाळ वातावरण होते.
दाट धुक्याची चादर होती. हवामान विभागाने शहर आणि जिल्हा परिसरात येत्या शनिवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या पावसाने ऊसासह सोयाबीन, भात, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी भात, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, मका, बाजरी आदी पिके शेतकऱ्यांनी काढणी करून मळणीसाठी रचून ठेवली. मात्र, पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत.
या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागातही पावसाचा जोर राहिल्याने खटाव तालुक्यात शेतकऱ्यांना दुसऱ्यांदा कांदा रोपे तयार करण्याची वेळ आली आहे. कांदा रोपांचा उत्पादन खर्च 40टक्क्यांनी वाढल्याने आता कांद्याचा उन्हाळी हंगाम अडचणीचा ठरणार आहे. कांदा पीक वाया गेल्याने कांदा बी साडेतीन हजार रुपये किलो अशा चढ्या दराने खरेदी करायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.