पुणे : शहरावर पाणीकपातीचे संकट ओढावले असतानाच; शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खडकवासाला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये ओढे, नाले तसेच उपनद्यांमधून पाण्याचा येवा सुरू झाला असून, गेल्या दोन दिवसांत धरणाचा पाणीसाठा 0.22 टीएमसीने वाढला आहे. 2 जुलै रोजी 2.51 टीएमसीवर असलेला पाणीसाठा 4 जुलै रोजी संध्याकाळी 2.74 टीएमसीवर गेला आहे. तर पुढील तीन ते चार दिवस हवामान विभागाने घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने पुढील काही दिवसांत पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने दर्शविली आहे. सोमवारी सायंकाळनंतर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वदूर चांगला पाऊस सुरू होता.
राज्यात वेळेवर मान्सून दाखल झाला असला तरी या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा अतिशय कमी असल्याने सोमवारपासून शहरात दिवसाआड पाणी देण्यास सरुवात करण्यात आली आहे. असे असतानाच पावसाला सुरुवात झाल्याने धरणसाठा वाढत असल्याने शहरालाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, मागील 24 तासांत खडकवासला धरण परिसरात 6 मिमी, पानशेतमध्ये 25 मिमी, वरसगावमध्ये 25 मिमी आणि टेमघर धरणात 39 मिमी पाऊस पडल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. तर कोकणात सुरू असलेल्या पावसामुळे मोसे खोऱ्यातूनही पाणी येऊ लागल्याने वरसगाव धरणाचा पाणीसाठा वाढण्याची शक्याही वर्तविण्यात आली आहे.
शहरातही जोरदार सरी
गेल्या तीन आठवड्यांपासून दडी मारलेल्या मान्सूनच्या पुनरागमनाने सोमवारी पुणेकर सुखावले. शहराच्या वेगवेगळ्या भागांत दिवसभर थांबून थांबून जोरदार पाऊस झाला असला तरी हवामान विभागाकडे या पावसाची नोंद दहा मिमी पेक्षाही कमी झाली आहे. सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यानंतर दुपारी काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने सायंकाळी 6 नंतर मात्र शहरभर हजेरी लावली. त्यामुळे ऐन कार्यालयीन कामकाज संपण्याच्या वेळी आलेल्या या पावसाने घरी परतणाऱ्या चाकरमान्या पुणेकरांची तारांबळ उडाली. शहरात अनेक चौकांत पुन्हा ठिकठिकाणी पाणी साचल्याने तसेच अनेक चौकांत सिंग्नल यंत्रणा बिघडल्याने अनेक प्रमुख रस्त्यांवर तसेच चौकातही वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, पुढील तीन दिवस शहरासह जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेआठ वाजता शिवाजीनगर येथे 7.9 मिमी, लोहगाव 2.6 मिमी, मगरपट्टा 12.5 मिमी तर लवळे येथे 9 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रस्त्यांवर पुन्हा पाणी
सोमवारी दिवसभर झालेल्या पावसाने शहरातील अनेक चौक तसेच रस्त्यांवर पाणी साचले होते. अचानक येणाऱ्या पावसाने शहरातील वाहतुकीचा वेग सायंकाळी मंदावला होता. तर हवामान विभागाकडूनही सायंकाळनंतर मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शहरात पालिकेची यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे.