नगर – शहरातील रस्त्यांची चाळण झाली असून खड्डे नसलेला रस्ता दाखवा आणि बक्षिस मिळवा अश्या आता पैजा लावण्याच्या तयारीत नगरकर आहेत. गणपती आणि मोहरम च्या विसर्जनापूर्वी ज्या रस्त्यांची डागडूजी होणे अपेक्षित होते त्याच रस्त्यांची आज दुरवस्था झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यापैकी काही रस्त्यांची डागडुजी झाली होती ती नंतर पावसाने वाहून गेली. तर काही रस्त्यांची डागडुजी ही कागदावरच राहिली, असल्याचे चित्र सद्या दिसते आहे.
शहरातील सर्वच रस्त्यात खड्ड्यांचे जाळे वाढलेले दिसते.एकाही रस्त्यातून माना वर करून चालता येत नाही अशी स्थिती शहर आणि उपनगरातही दिसते. एखादा माणूस ताठ मानेने चाललाच तर तो ठेचकाळक्या शिवाय राहात नाही, अशी सध्याची स्थिती आहे.घुमरेगल्ली ते जुने पाठक हॉस्पिटल हा रस्ता वगळता तख्ती दरवाजा ते शनीचौक, शनी चौक ते जुनी महानगर पालिका या रस्त्याची अवस्था तसेच कोतवाली ते पंचपीर चावडी तसेच नेता सुभाष चौक ते तेली खुंट या रस्त्यांची अवस्था मोठी बिकट आहे.
सिद्धीबाग ते न्यू आर्टस महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्याचे काम पुन्हा एकदा रखडले मात्र मनपाने जेवढे काम केले त्यारस्त्याचीही डागडूजी केली नाही या ठिकाणी मोठे पाईप टाकले तेथे रस्ता धड बुजविलाही नाही.त्यामुळे तेथे मोठे खड्डे आणि उंचवटेतयार झाले आहेत. या रस्त्यातून ये-जा करतांना जीव मुठीत घेवून चालावे लागते. हे रस्ते प्रामुख्याने दुरूस्त करावेत अशी नगरकरांची मागणी आहे.
मनपाच्या अभियंत्यांच्या सांगण्यानुसार गणपती विसर्जन ,आणि मोहरम मिरवणुक मार्ग प्राधान्याने हाती घेवून प्राधान्याने त्यांची डागडुजी करण्यात आली.मात्र त्यात अंतर्गत रस्ते पावसाने व अन्य कारणाने राहून गेले. मात्र ते रस्ते पुढच्या आठवड्यात डागडुजीसाठी हाती घेतले जाणार आहेत.
पावसामुळे थांबविली डागडुजी
रस्त्याच्या डागडुजीच्या विषयाची निविदा मंजूर झाली असून याकार्यारंभ आदेशही देण्यात आला असून मध्यंतरी झालेल्या पावसामुळे हे काम थांबविण्यात आले होते. मात्र आता पुढच्याच आठवड्यात डागडुजीचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अभियंता एम. एस. पारखे यांनी दिली