मुंबई –आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यात भारतीय संघ अपयशी ठरल्यानंतर विविध स्तरांवरून संघावर टीका होऊ लागली आहे. त्यातच सोशल मीडियावर भारतीय संघावर गंमतीदार पद्धतीने टीकाही होत असून विराट कोहली, रवी शास्त्री यांच्यासह अन्य काही व्यक्तींवर मिस्मही पोस्ट केले जात असून त्याला प्रचंड संख्येने लाईक्स केले जात आहे.
एका मिममध्ये भारताचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक एका कागदाच्या चिटोऱ्याकडे पाहात असतानाचा फोटो पोस्ट करण्यात आला.
विराट कोहलीचाच वाढदिवस होता ना, मग हा बिलाचा कागद त्याच्याकडेच देऊ तोच बिल भरेल, अशी कॅप्शन देण्यात आली आहे.
उपांत्य फेरीतील एकमेव भारतीय
पाकिस्तानच्या शोएब मलिकने वादळी फलंदाजी करत पाकिस्तानला स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून दिला. त्यावेळी त्याची पत्नी व भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा इजहान या आपल्या मुलासह स्टॅंडमध्ये बसून टाळ्या वाजवत शोएबला प्रोत्साहन देताना दिसून आली होती.
त्यावर, उपांत्य फेरीत दाखल झालेली एकमेव भारतीय, अशी मजेशीर कॅप्शन देण्यात आली आहे.
रशीदचे केले कोडकौतुक
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी आफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू रशीद खान याची गोलंदाजी निर्णायक ठरेल, अशी अपेक्षा केली जात होती. प्रत्यक्षात तसे घडले नाही व त्यांना न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला.
मात्र, त्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा व मेंटॉर महेंद्रसिंह धोनी रशीदचा भांग पाडताना तसेच त्याला पावडर लावतानाचा फोटो देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होता.