चिंबळी – गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली असल्याने भात पिकांसाठी हा पाऊस पोषक ठरणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
चिंबळी परिसरात सोमवारी (दि. 23) आणि मंगळवारी (दि. 24) सलग दोन दिवस दमदार हजेरी लावल्याने परिसरात सर्वत्र पाणीपाणी झाले असून रस्त्यांच्या दुरवस्थेत भर पडली आहे. दरम्यान, जुलै, ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे कडधान्यामधील वाल, मूग, उडीद आदी पिकांचे भरघोस उत्पादन आले असून त्यांची तोडणी सुरू असताना गेल्या दोन दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कामांचा पुन्हा खोळंबा झाला आहे. जर पाऊस असाच कोसळत राहिला तर हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ओढे-नाले वाहू लागले असून रस्तेही जलमय झाले आहेत. तर भात पिकांसाठी हा पाऊस फायदेशी असून हिरवे गार झालेल्या भात पिकांचे खाचरे पुन्हा भरून वाहू लागली असल्याने यंदा भाताचे भरघोस उत्पादन निघेल, अशी शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.