औरंगाबाद – राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाला असून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने धुमशान घातले आहे. सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील बीड, हिंगोली, जालन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. या पावसामुळे पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
जालना जिल्ह्यात रात्रभर सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात झालेल्या या अतिवृष्टीने नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अंबड तालुक्यातल्या मांगणी आणि गल्हाटी नदीला या पावसाने रात्रीतून पूर आला. या भागातील नदीकाठच्या करंजळा आणि घुंगर्डे हदगाव या गावात पाणी शिरले.
बीड जिल्ह्यातही रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी गावात पाणी शिरले आहे. गेवराई तालुक्यातल्या भोजगाव येथील अमृता नदीवरचा पूल वाहून गेल्याने नदीच पाणी गावात शिरल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. तर गोदावरी आणि सिंदफना नदीला पूर आल्याने देखील शेतीच मोठे नुकसान झाले आहे. मागच्या दोन दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे गेवराई तालुक्यातील सातही लघुप्रकल्प एकाच रात्रीत तुडूंब भरले असून गोदावरी दुथडी भरुन वाहत आहे.