पुणे – गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचा जोर रविवारी थोडा ओसरला आहे.कोकण वगळता अन्य ठिकाणी पावसाने उघडीप घेतली होती.
जोरदार पावसामुळे कोकणासह पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. ठाणे, रायगडमध्ये अतिवृष्टी झाल्याने नद्यांना पूर आले. त्यानंतर रविवारी पावसाने विश्रांती घेतली. पावसामुळे जे महामार्ग बंद होते, तेथून सुरळीत वाहतूक सुरू झाली. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या 24 तासांत अनेक भागात पावसाची शक्यता आहे. पण कोठेही अतिवृष्टी किंवा मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचेही सांगण्यात आले.
पुण्यात दिवसभर ढगाळ वातावरण
दरम्यान, पुण्यातही रविवारी दुपारनंतर पावसाचा जोर थोडा कमी झाला होता. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास तर पावसाने पूर्ण उघडीप दिली. गेले दोन ते तीन दिवस पडणाऱ्या सततच्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून वातावरण ढगाळ होते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शहरात सोमवारी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी होण्याचा अंदाज आहे.