कल्याणी फडके
पुणे – देशातील पर्जन्यमानामध्ये बदल होत असून आगामी काळात दक्षिण भारत आणि हिमालयाच्या पायथ्याशी अंदाजापेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खरगपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीने (आयआयटी) केलेल्या सर्वेक्षणामध्ये असा निष्कर्ष निघाला आहे. तर, विश्लेषणानुसार दक्षिण आशिया खंडातील पर्जन्यवृष्टीची दिशा दक्षिणेकडे सरकत असल्याचे मुख्य संशोधक आणि “सिव्हिल इंजिनिअरिंग’ विभागाचे प्राध्यापक रजिब मैती यांनी म्हटले आहे.
आयआयटी खरगपूर येथील संशोधकांनी भारतातील 1930 ते 70 या काळातील पर्जन्यमानाचा आधार घेत आणि 1971 ते 2017 या सुमारे पाच दशकांतील पर्जन्यमानाचा अभ्यास केला आहे. या अभ्यासावर आधारित निष्कर्ष संस्थेने शुक्रवारी जाहीर केला. या अभ्यासानुसार, उत्तर आणि मध्य भारताच्या तुलनेत दक्षिण भारतामध्ये पर्जन्यवृष्टीच्या कमाल मर्यादेपेक्षा जादा पाऊस झाल्याचे जाहीर करण्यात आले.
नेचर पब्लिशिंग ग्रुपच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेला “सायन्टिफिक रिपोर्ट’ औद्योगिक आणि कृषीक्षेत्रासाठी उपयुक्त आहे. दक्षिण आशियातील सिंचन व्यवस्था प्रगत असूनही, मान्सूनवर अधिक अवलंबून आहे. जल व्यवस्थापनाचा आराखडा तयार करणारे आणि कृषी क्षेत्रातील व्यक्ती यासाठी या अभ्यासाचा निष्कर्ष फायदेशीर आहे. विशेषत: भारताचा दक्षिणेकडील आणि हिमालयाच्या पायथ्याचा भागात आराखड्यातील निकष आणि पीक पद्धतींमध्ये बदल करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे, असे संस्थेचे संचालक प्रा. विनेन्द्र तिवारी यांनी सांगितले.
हा बदल घडण्यामागील कारणांबाबत बोलताना मैती म्हणाले की, उष्णकटीबंधीय हिंद महासागरातील अभिसरणाच्या तीव्रतेमुळे भारतातील अनेक भागात विरोधाभास निर्माण होऊ शकतो. या तीव्रतेनुसार संपूर्ण देशाता मान्सूनचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
आमच्या विश्लेषणानुसार नैऋत्य मौसमी वारे हिंदी महासागराच्या पूर्वेकडे वाहत आहेत. या दिशा बदलामुळे दक्षिण आणि उत्तर भारतात पर्जन्यमानात बदल होण्याची शक्यता आहे. यासह म्यानमार, थायलंड आणि मलेशिया सारख्या देशांमध्ये देखील अतिवृष्टी संभावते, असे मैती यांनी नमूद केले.