पुणे : अंदमानात दोन दिवसापूर्वी मोसमी पावसाचे आगमन झाले. त्यामुळे यंदा तीव्र उन्हाळा अनुभवल्यानंतर हव्याहव्याशा वाटणाऱ्या गारव्याची चाहूल लवकर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सहा दिवस आधीच मोसमी पाऊस अंदमानात पोहोचला आहे. परिणामी महाराष्ट्रात देखील नैर्ऋत्य मोसमी वारे लवकरच धडकण्याची चिन्हे असल्याचे सांगण्यात येत आहेत. दरम्यान, येत्या तीन ते चार दिवस राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
येत्या चारपाच दिवसांत २१ मेपर्यंत दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्याच्या काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच सुमारास मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी उष्ण लाट येण्याची शक्यता आहे. गुरुवारी मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे, मराठवाडय़ातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद, कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
२० आणि २१ मे रोजी विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला, यवतमाळ जिल्ह्यांत एकदोन भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. आग्नेय अरबी समुद्रात वादळी वाऱ्यासह होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळपर्यंत उस्मानाबादमध्ये जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, तर सातारा, सांगली, कोल्हापूर येथे सोसाटय़ाच्या वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी वगळता इतरत्र पावसाची नोंद करण्यात आली नाही.