अकलूज –माळशिरस तालुक्यात वरुणराजाची कृपादृष्टी झाल्याने वेळेत पावसाला सुरुवात झालेली असल्याने वरुणराजाच्या दमदार हजेरीने बळीराजा सुखावला आहे.
अकलूज ता. माळशिरस परिसरात रविवारी सायंकाळी 2 तास दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे परिसरातील ओढे, नाले खळखळून वाहू लागले आहेत. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून ऊस लागवडीसाठी सरी सोडलेली होती.
अचानक वरुणराजाची हजेरी लागली. दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत दमदार पाऊस पडलेला असल्याने ऊस शेतामध्ये मोठया प्रमाणात पाणी साचलेले दिसत आहे.
बळीराजाने खरीप हंगामासाठी आपली शेतामधील सर्व मशागती करून घेतलेल्या आहेत तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी दमदार पाऊस पडलेला असल्याने वेळापूर येथील पुणे-पंढरपूर महामार्ग पाण्यात गेला होता. त्यामुळे काही वेळ खोळंबली होती. वाफसा आल्यानंतर पेरणी करण्यासाठी शेतकर्यांची लगबग सुरू होणार आहे.