हिंगोली – राज्यातील वातावरणात बदल झाला असून अेनक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. बुधवारी राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळत असला तरी, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील केळी उत्पदकांचे काल झालेल्या पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 500 हेक्टरवरील केळीच्या बागा या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जमीनदोस्त झाल्या आहेत.
जिल्ह्यातील गिरगाव कुरुंदा यासह दहा ते बारा गावाच्या शेत शिवारातील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या भागातील बहुंताश शेतकरी केळीचे पिक घेतात. कालच्या वादळी वाऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. वसमतचे तहसीलदार अरविंद बोळंगे आणि कृषी अधिकारी गोविंद कल्याणपाड यांनी स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे. बोळंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचशे हेक्टर शेतजमिनीवरील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या असून यात शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे.
दरम्यान, पुढील 48 तासात मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकमध्ये अडखळलेला मान्सून आता लवकरच कोकणात दाखल होणार आहे. दरम्यान, यंदा मान्सून लवकर येणाचा अंदाज वर्तवण्यात येत होता, मात्र, मान्सून येण्यास उशीर होत असल्याचे दिसत आहे.