दिसपूर – आसाममध्ये वादळी आणि विजांच्या कडकडटासह पाऊस सुरु आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (ASDMA) ने रविवारी माहिती दिली की, जोरदार वादळ, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे राज्यातील मृतांची संख्या 14 वर पोहोचली आहे. याआधी शनिवारी वादळामुळे आठ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती.
एकूण 592 गावातील 20286 लोक बाधित –
15 एप्रिल रोजी डिब्रूगड जिल्ह्यातील टिंगखॉंग भागात चार, बारपेटा जिल्ह्यात तीन आणि गोलपारा जिल्ह्यात 14 एप्रिल रोजी एकाचा मृत्यू झाला. गोलपारा, बारपेटा, दिब्रुगड, कामरूप (मेट्रो), नलबारी या 592 गावांमध्ये एकूण 20,286 लोक बाधित झाले आहेत. शनिवारी एएसडीएमएच्या अहवालात म्हटले आहे की, चिरांग, दरंग, कचार, गोलाघाट, कार्बी आंगलाँग, उदलगुरी, कामरूप जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळ आले आहे.
अनेक घरे उद्ध्वस्त –
दिब्रुगड जिल्ह्यातील टिंगखॉंग भागात वादळामुळे बांबूची झाडे उन्मळून पडल्याने एका अल्पवयीन मुलीसह चार जणांचा मृत्यू झाला. गोलपारा जिल्ह्यातील माटिया भागात एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. काल ASDMA च्या अहवालात असेही म्हटले आहे की, 5,809 कच्ची घरे आणि 655 पक्की घरांचे अंशत: नुकसान झाले, तर 853 कच्ची घरे आणि 27 पक्की घरे पूर्णपणे उद्धवस्त झाली. याशिवाय राज्यातील 12 जिल्ह्यांतील इतर 34 तालुक्यांनाही अतिवृष्टी आणि वादळाचा फटका बसला आहे.