भोर – हिर्डोशी खोऱ्यातील कोंढरी गावातील जमिनीला अतिवृष्टीत भेगा पडून मोठे नुकसान झाल्याने भयभित झालेल्या कोंढरी गावचे 35 ते 40 कुटुंबातील 120 लोकांना तात्पुरते हिर्डोशी येथील जि.प.च्या प्राथमिक शाळेत शासनाच्या आपत्कालिन व्यवस्थेने स्थलांतरीत केले होते. मात्र, आता पाऊस कमी झाला आहे, उघडला आहे, तुम्ही गावात तुमच्या घरी परत जा, असे भोरचे उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांनी सांगताच ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत आधी आमच्या गावाचे पुनर्वसन करा, त्यानंतरच घरी जाऊ, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. शासकीय अधिकाऱ्यांच्या अशा विनंतीवजा सूचनांबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राज्याचे पुनर्वसन राज्य मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे सहपालक मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, आमदार संग्राम थोपटे, खासदार सुप्रीया सुळे यांनी दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांची घटनास्थळी भेट देऊन त्यांना पुनर्वसनाचे अश्वासन दिले होते. मात्र, तब्बल 14 दिवसानंतर पाऊस कमी झाल्यानंतर भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसिलदार अजित पाटील यांनी तात्पुरते स्थलांतरीत केलेल्या कोंढरी ग्रामस्थांना त्यांच्या मुळघरी जाण्याची विनंती केली असता नैसर्गिक आपत्तीने घाबरलेल्या ग्रामस्थांनी यास नकार दिला. तेंव्हा उपविभागिय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी भूगर्भतज्ञ रेड्डी यांच्याशी संपर्क साधून डोंगराला किंवा गावाला सद्यस्थितीत धोका नसल्याची खात्री केल्यानंतरखच कोंढरी ग्रामस्थांना त्यांच्या मूळ घरी जाण्याची विनंती केली. मात्र, आमच्या गावाचे आधी पुनर्वसन शासनाने करावे मगच आम्ही गावच्या मूळ घरी पुन्हा परत जावू, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.
कोंढरी गावच्या पुनर्वसनाबाबत प्रयत्नशिल असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी पत्रव्यवहार सुरु केला असून त्यांनी विभागीय आयुक्तांना या कामी स्वतः लक्ष घालून प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत, ही पहा पत्राची प्रत.
– संग्राम थोपटे, आमदार, भोर