पुणे – जिल्ह्यात जून ते ऑक्टोंबर या पाच महिन्यांत अतिवृष्टी व पुरामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले. त्याच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक येत्या मंगळवारी (दि.22) पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. पाहणी अहवालानंतर केंद्रांकडून आर्थिक मदत मिळणार आहे.
दरम्यान, हे पथक तब्बल दोन महिने उशिरा येत असल्याने झालेले नुकसान दाखविण्यासाठी कोणतेही पीक शेतात नाही. तसेच काही शेतकऱ्यांनी शेताच्या बांधाची दुरुस्ती केली आहे. त्याचबरोबर शेतात वाहून आलेली मातीसुद्धा काढली आहे. त्यामुळे या पथकांना आता नदीकाठचा परिसर तसेच नुकसान झालेल्या त्यावेळी काढलेले छायाचित्र दाखविले जाणार आहे.
पुणे विभागात अतिवृष्टीमुळे 49 व्यक्तींचा मृत्यू झाला असून, 2,623 जनावरांचा बळी गेला आहे. पुणे विभागातील तब्बल 6 लाख 29 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. तर 7 हजार 67 हेक्टर क्षेत्रातील शेत जमिनीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा शेतकऱ्यांसाठी मारक ठरला.
पुणे जिल्ह्यातील 78 हजार 158 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. तसेच 910 हेक्टर क्षेत्रावरील जमीन खरडून गेली आहे. पुणे जिल्ह्यात 13 व्यक्तींचा मृत्यू झाला. तर पुण्यातील 1 हजार 566 घरांची पडझड झाली.