प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर प्रवाशांना जागा
नवी दिल्ली – लांब पल्ल्याचा विनाआरक्षित रेल्वेत प्रवास करताना जागा मिळवण्यासाठी होणारी धडपड, आता थांबणार आहे. बायोमॅट्रिक तंत्रज्ञानाचा वापर विनाआरक्षित डब्ब्यांमधून प्रवास करण्यासाठी करण्यात येणार असून त्याचा एक प्रयोग पुष्पक एक्सप्रेसमध्ये यशस्वी झाला आहे. त्यामुळे आता लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी हा पर्याय वापरण्यात येण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे.
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेतील प्रवास अधिक सुखकर होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पाऊले उचलणार असल्याचे सांगितले होते. अर्थसंकल्पातही रेल्वेचा सुरक्षित आणि सुखकर प्रवास याचा विशेष उल्लेख करण्यात आला होता. त्याच दिशेने पाऊल उचलले जात असल्याचे दिसत आहे. रेल्वेचे आरक्षित तिकीट न मिळाल्यास किंवा आरक्षित प्रवासाचे दर भरणे शक्य नाही असे प्रवासी विनाआरक्षित डब्यातून बसून प्रवास करता यावा यासाठी रेल्वे सुटते त्या रेल्वे स्थानकावर गर्दी करतात. अनेकदा दिवसरात्र रांगेत उभे राहतात, पण तरी देखील डब्यात बसायला जागा मिळेलच याची शाश्वती नसते. मात्र, आता असे होणार नाही, जो पहिला येईल त्याला बायोमेट्रिक तंत्रज्ञानानुसार पहिली जागा मिळेल.
अनेकदा रेल्वे स्थानकातील दलाल, शिपाई, हमाल ज्यादा पैसे घेतलेल्या प्रवाशांना आधी डब्यात घुसवतात आणि बाकीच्यांना नंतर प्रवेश मिळतो. असे सर्व प्रकार रोखण्यासाठी आता ट्रेनने विनाआरक्षित डब्ब्यातून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना बायोमेट्रिक मशीनमधून जावे लागणार आहे. या मशीनवर आपल्या बोटाचे ठसे दिल्यानंतर प्रवाशाला एक क्रमांक दिला जातो. त्यामुळे गाडी प्लॅटफॉर्मवर लागल्यानंतर त्या प्रवाशाला सहज आपल्या जागेवर बसता येईल.