एका शहरातून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवली औषधे
पुणे – सध्या वाहतुकीवरील निर्बंध काही ठिकाणी कायम आहेत. त्यामुळे एका शहरातून दुसऱ्या ठिकाणी औषधे पोहोचवणे अवघड होत आहे. याच पार्श्वभूमीवर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीला रेल्वे धावून येत आहे. रेल्वेने रुग्णांपर्यंत आवश्यक ती औषधे जलदरित्या पोहोचवणे शक्य होत आहे.
रेल्वेकडून सध्या विशेष प्रवासी गाड्या, पार्सल गाड्या, श्रमिक गाड्या सोडण्यात येत आहेत. यातून विविध वस्तुंची वाहतूक करण्यात येते. मात्र, सध्या याच गाड्यांच्या मदतीने रेल्वे औषधे पोहोचवत असून, याबाबत रुग्ण आणि नातेवाईकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मागील काही दिवसांत मध्य रेल्वेकडून मुंबई ते ब्रह्मपूर, मुंबई ते बेंगलुरू, मुंबई ते बेळगाव, कांजूरमार्ग ते सोलापूर, कळवा ते विन्हेरे (कोकण विभाग), परळ ते वैभववाडी आणि मुलुंड ते गोरखपूर या मार्गांवर औषधे पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 8 हून अधिक ठिकाणी कर्करोगाच्या रुग्णांची औषधे पाठवली असल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले.
औषधांचा प्रवास 4 टप्प्यांचा
बेळगाव येथील कर्करोगाच्या दोन रुग्णांना तातडीने औषधांची आवश्यकता असल्याने, मुंबईहून बेळगावकडे जाणारी थेट गाडी नसल्याने 4 टप्प्यात औषधे पाठवण्यात आली. संबंधित औषधे सीएसएमटी ते पुणे येथे विशेष पार्सल गाडीने पाठवली. पुण्याहून साताऱ्याला कामगारांसाठी असलेल्या विशेष गाडीने गार्डच्या डब्यातून आणि तिसऱ्या टप्प्यात श्रमिक विशेष गाडीच्या गार्डच्या डब्यातून सातारा येथून मिरजमध्ये पोहोचली. तर चौथ्या टप्प्यात मिरज ते बेळगाव मालगाडीतील गार्डच्या डब्यातून बेळगाव येथे पोहोचवली.