पुणे – दिवाळीनिमित्त प्रवाशांची संख्या अधिक असल्याने रेल्वेकडून दरवर्षी जादा गाड्या सोडण्यात येतात. यंदाही पुण्याहून अन्य शहरांत जाणाऱ्या गाड्यांतील प्रवाशांची संख्या मोठी आहे. प्रामुख्याने उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांचे 100 टक्क्यांहून अधिक, तर विदर्भाकडे जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण 50 टक्क्यांहून कमी असल्याचे चित्र आहे.
दिवाळीनिमित्त मूळगावी जाणारे नागरिक आणि पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असते. त्यामुळे रेल्वेकडून दरवर्षी नियमितशिवाय जादा गाड्या सोडण्यात येतात. परंतु, यंदा रेल्वेची नियमित प्रवासी सेवा अद्याप सुरू झाली नसल्याने रेल्वेकडून ठराविक मार्गांवर विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. या गाड्यांशिवाय रेल्वेच्या उत्सव विशेष गाड्याही धावल्या.
दिवाळी आणि छट पूजेच्या निमित्ताने प्रामुख्याने उत्तरेकडे विशेष गाड्या सोडल्या होत्या. त्यापैकी बहुतांश गाड्यांची आरक्षणे फुल्ल झाली असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेच्या पुणे विभागातून दिल्ली, हावडा, दानापूर, इंदौरसह डेक्कन क्वीन, इंद्रायणी (मुंबई) या गाड्या सोडण्यात येत आहेत. त्यापैकी उत्तरेकडील मार्गांवर उत्सव विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या.
आरक्षण फुल्ल झाल्याने अनेक गाड्यांची प्रतीक्षा यादीदेखील अधिक आहे. राज्यांतर्गत धावणाऱ्या कोयना एक्स्प्रेस, महाराष्ट्र एक्स्प्रेस या गाड्यांसह पुण्याहून 29 नोव्हेंबरपर्यंत सुटणाऱ्या दानापूर एक्स्प्रेस, मंडुआडीह एक्स्प्रेस, संतरागांछी एक्स्प्रेस, निज्जामुद्दीन एक्स्प्रेस, जबलपूर एक्स्प्रेस, जयपूर एक्स्प्रेस, दरभंगा एक्स्प्रेस, गोरखपूर एक्स्प्रेस, झांशी एक्स्प्रेस या गाड्यांचे आरक्षण 100 टक्क्यांहून जास्त आहे. तर पुण्याहून अंजनी, नागपूर, अमरावती या गाड्यांचे आरक्षण 50 टक्क्यांहून कमी झाले आहे.