मालवाहतुकीवर भर : व्यवसाय विकास युनिट स्थापन
– कल्याणी फडके
पुणे – रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद असल्याने, प्रवासी वाहतुकीतील आर्थिक तूट भरून काढण्यासाठी रेल्वेने उत्पन्नाचा “ट्रॅक’ बदलला आहे. सध्या मालवाहतुकीवर अधिक भर देण्यात येत असून, यासाठी रेल्वेने युद्धपातळीवर प्रयत्नदेखील सुरू केले आहेत. मध्य रेल्वेच्या मुख्यालयासह पाचही विभागांमध्ये व्यवसाय विकास युनिटची (बीडीयू) स्थापना केली असून, या माध्यमातून खासगी कंपन्या, कारखान्यांशी समन्वय साधण्यात येत आहे.
करोनामुळे रेल्वेची प्रवासी वाहतूक स्थगित झाली. यामध्ये उपनगरीय (लोकल), लांब पल्ल्याच्या रेल्वे रद्द करण्यात आल्या. या कालावधीत रेल्वेकडून श्रमिक विशेष गाड्या, विशेष प्रवासी गाड्या, पार्सल गाड्या आणि मालगाड्यांचे संचलन सुरू होते. मंदीतील संधीचा फायदा घेत, रेल्वेने लॉकडाऊनच्या काळात धान्य, भाजीपाला, फळे, साखर, खते, पेट्रोलियम पदार्थ, विविध वस्तू आदींची काही हजार टनांच्या घरात वाहतूक केली. यातून लाखोंचे उत्पन्न मिळाले आहे. याशिवाय मागील महिन्यापासून रेल्वेतून वाहन विषयातील कंपन्यांशी करार केला असून, वाहनांच्या वाहतुकीला सुरूवात केली आहे.
एप्रिलपेक्षा मालवाहतुकीचे उत्पन्न वाढत असल्याचे चित्र आहे. मागील चार महिन्यांत मध्य रेल्वेने साधारण 350 कोटींहून अधिक रुपयांच्या आरक्षित तिकीटांचा परतावा नागरिकांना दिला आहे. परिणामी, रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीतून होणारा तोटा भरून काढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे.
बीडीयू म्हणजे काय?
मध्य रेल्वेने व्यवसाय वाढवण्यासाठी व्यवसाय विकास युनिटची (बिझनेस डेव्हलपमेंट युनिट) निर्मिती केली आहे. या अंतर्गत मुख्यालयासह पुणे, मुंबई, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर या विभागांतील अधिकाऱ्यांचे पथक आहे. ही पथके मालवाहतुकीच्या अनुषंगाने बैठका घेऊन समन्वय साधत आहेत. याशिवाय त्यांच्या समस्या जाणण्याचे काम करत आहेत.
मध्य रेल्वेच्या पुणे, मुंबई, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर विभागांच्या विविध स्थानकांतून मोठ्या प्रमाणावर विविध वस्तुंची वाहतूक करण्यात येत आहे. देशभरातील वाहतुकीच्या बरोबरीने बांग्लादेशला देखील मोठ्या प्रमाणावर कांद्याची वाहतूक केली आहे. याशिवाय रेल्वे आणि पोस्टाकडून देखील एकत्रित सेवा देण्यात येत आहे. याला प्रतिसाद मिळत आहे.
– शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे