मुंबई – देशात कोरोना व्हायरसने हातपाय पसरताच मुंबईच्या धमन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, उद्या पासून ‘अनलॉक’चा पाचवा टप्पा सुरु होणार आहे. अनलॉक पाच मध्ये हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार उघडणार आहेत. मात्र, मुंबई लोकल कधी सुरू होणार याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.
सध्या लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने कामावर जाण्यासाठी लोक घराबाहेर पडत आहेत. पण लोकल सुरु नसल्याने नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान, केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे.
पीयूष गोयल म्हणाले कि, “राज्य सरकारनं मागणी केल्यानंतरच आम्ही त्याबाबत निर्णय घेऊ,’ असं गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता जेव्हा राज्यसरकार लोक रेल्वे सुरू करण्याबद्दल विचार करेल तेव्हाच मुंबईकरांना लोकलचा प्रवास करता येणार आहे.
करोनाच्या लॉकडाऊननंतर राज्य सरकारनं ‘पुनश्च हरिओम’ केले आहे. टप्प्याटप्प्यानं अनेक गोष्टी खुल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, सर्वांना प्रतीक्षा आहे ती मुंबई लोकलची.