लॉकडाऊनमध्ये पुणे विभागाकडून धावल्या 800 पेक्षा अधिक गाड्या
पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून सुमारे 800 पेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या गाड्या धावल्याची माहिती पुणे विभागाकडून देण्यात आली.
करोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवासी रेल्वे वाहतूक बंद केली आहे. या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रेल्वेने आपली मालवाहतूक सेवा पूर्णतः सुरू ठेवली आहे. 22 मार्चपासून पुणे विभागाकडून उत्तर आणि दक्षिण भारतातील विविध क्षेत्रांमध्ये या गाड्या सोडल्या होत्या. गाड्यांमध्ये लहान पार्सल आकारातील वैद्यकीय साहित्य, अन्नधान्य, पेट्रोलियम पदार्थ आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली जाते. मध्य रेल्वेच्या पुणे, मुंबई, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर या पाच विभागातून माल गाड्यांची सेवा सुरू आहे. या गाड्यांचे संचलन सुरळीत होण्यासाठी स्टेशन मास्टर, पॉइंटमॅन, गार्ड, लोको पायलट, कंट्रोलर आदी सातत्याने प्रयत्न करत आहेत. पुणे विभागातील पुणे, सातारा, मिरज आणि कोल्हापूर या स्थानकांवर अन्नधान्यांची लोड-अनलोड करण्यात आले. याशिवाय विभागामध्ये सिलेंडरची देखील वाहतूक करण्यात आली.
सिमेंट, लोखंडाचीही वाहतूक…
राज्य सरकारशी समन्वय साधून सिमेंट, लोखंड आदींच्या रेकची वाहतूक केली. तर लोणी स्थानकांतून 8 लाख लीटर पेट्रोलियम उत्पादनांचे 16 रेक लोड केले. याशिवाय बारामती स्थानकांतून डिंडिगुल आणि तमिळनाडू क्षेत्रामध्ये सुमारे 3500 टन साखर रेल्वेद्वारे नेण्यात आली, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.