पाली(राजस्थान) – राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील “बोमाडाडा’ या गावाजवळ सोमवारी पहाटे साडेतीन वाजता सूर्यनगरी सुपरफास्ट रेल्वे रुळावरून घसरली. रेल्वेचे 3 डबे पलटले, तर 11 डबे रुळावरून घसरले. सध्या या अपघातात जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी चार विद्यार्थ्यांसह 24 प्रवासी जखमी झाल्याची माहीती आहे.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी तातडीने अपघातस्थळी हजर झाले. ते सध्या अपघातामागील कारणाचा शोध घेत आहेत. अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तातडीने बचावकार्यासाठी पथक रवाना करत जखमींना नुकसान भरपाईचीही घोषणा केली आहे. सूर्यनगरी एक्स्प्रेस वांद्रे (मुंबई) येथून जोधपूरच्या दिशेने जात होती. पहाटे 2.48 ला मारवाड जंक्शनला थांबा घेतल्यानंतर, तेथून ती 3:09 वाजता पालीकडे निघाली.
याच दरम्यान बोमाडाडा गावाजवळ हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बहुतांश प्रवासी झोपेत होते. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वेमध्ये एकूण 26 डबे होते.