रायगड – जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील तळीये गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जवळपास 36 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही नागरिक अडकले असून बचावकार्य सुरू आहे. हा आकडा वाढण्याची भीती आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून कोकणातील काही शहरं आणि गावं पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. सततच्या पावसामुळं सातारा आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. यात सर्वात मोठी दुर्घटना ही तळीये गावात घडली असून या घटनेने हाहाकार माजला आहे.
काल रात्रीच्या सुमारास ही दरड कोसळल्याची माहिती आहे. मात्र हा दुर्गम डोंगराळ भाग असल्याने मदत कार्यात अडथळे येत होते. मात्र काही वेळापूर्वी एनडीआरएफची टीम ज्यावेळी इथं पोहोचली त्यावेळी ही भयंकर घटना समोर आली. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. गेल्या काही तासांपासून इथं रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
एनडीआरएफसह स्थानिक प्रशासनची टीम देखील या ठिकाणी काम करत आहे. घटनेनंतर या गावालगतच्या सर्व वाड्यांमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
दरम्यान, पोलादपूर सुतारवाडी परिसरातही दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. पाच लोक अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. चार जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. या गावांना जोडणारे पितळवाडी-उमरठ फाटा पूल तसेच उमरठ फाटा ते साखर पूल देखील वाहून गेल्यामुळे मदत यंत्रणा पोहोचू शकत नसल्याची माहिती आहे.