रायगड – राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने थैमान घातल्याने पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. कित्येक ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला आहे. कोकण भागात अनेक शहरात, गावागावात पाणी शिरल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलादपूर सुतारवाडी परिसरात दरड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रूमकडून देण्यात आली आहे. तर, पाच जण ढिगाऱ्याखाली अडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे नद्या नाल्यांना पूर आले आहे. कोकण विभागात पावसामुळे अनेक जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली असून जनजिवन विस्कळीत झाले आहे.