नवी दिल्ली – निवडणूक आचारसंहिता सुरू असताना आयकर विभागामार्फत छापे घालून विरोधकांना लक्ष्य केले जात असल्याच्या प्रकारावरून सध्या मोठेच राजकीय वादंग निर्माण झाले आहे. त्या संबंधात निवडणूक आयोगाने महसुल सचिव ए. बी. पांडे आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष पी. सी. मोदी यांना चर्चेसाठी पाचाण केले आहे. यावेळी त्यांना या छाप्यांबाबत खुलासा करण्यास सांगण्यात आले असे समजते.
या छाप्यांबाबत निवडणूक आयोगाने अर्थमंत्रालयाला रविवारी एक पत्र पाठवून ही कारवाई पुर्णपणे न्युट्रल आणि भेदभाव विरहीत असावी अशी सुचना केली होती. आयकर विभागाने कर्नाटक, मध्यप्रदेश, तामिळनाडु आणि आंध्रप्रदेशात भाजप विरोधी राजकीय पक्षांच्या नेत्यांवर आणि त्यांच्याशी संबंधीत व्यक्तींवर छापे घातले आहेत. त्यावरून मोठेच वादंग माजले आहे. सरकारी यंत्रणांचा वापर करून विरोधकांना दहशततीत घेतले जात आहे असा आरोप विरोधकांनी केला असून त्यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. या छाप्यांमध्ये करचुकवेगीरी करून जमवण्यात आलेली कोटयवधी रूपयांची रोकड जप्त करण्यात आल्याची माहिती आयकर विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.