मुंबई : भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुल याला न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून वगळल्याने माजी कसोटीपटू व वेगवान गोलंदाज झहीर खान याने निराशा व्यक्त केली आहे. तसेच राहुल संघाबाहेर असल्याचा फटका कसोटी मालिकेत भारतीय संघाला बसेल असेही मत त्याने कर्णधार विराट कोहलीला उद्देशून व्यक्त केले.
टी-20 मालिकेत न्यूझीलंडला 5-0 असा व्हाइटवॉश देणाऱ्या भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेत 3-0 असा व्हाइटवॉश देत न्यूझीलंडने वचपा काढला. आता या दोन संघात कसोटी मालिका होत असून प्रचंड भरात असलेला राहुल संघात का नाही याचे आश्चर्य वाटत असल्याचेही झहीरने व्यक्त केले आहे.
या वर्षी भारतीय संघ टी-20 आणि एकदिवसीय सामने जास्त खेळणार असला तरीही राहुलच्या फॉर्मचा लाभ संघाने कसोटी मालिकेत देखील करून घ्यायला हवा होता. निवडसमितीने कोणते निकष लावून त्याला संघाबाहेर ठेवले आहे हेच समजत नाही अशा शब्दांत झहीरने आपली नाराजी व्यक्त केली आहे. राहुलचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला कसोटी संघातून का वगळण्यात आले याचे कोडेच आहे. तो संघात नसल्याचा फटका या मालिकेत भारतीय संघाला निश्चितच बसेल, असेही झहीर म्हणाला.