केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना न्यूलँड्स क्रिकेट स्टेडियम, केपटाऊन येथे मंगळवारपासून सुरु झाला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात 223 धावा केल्या.
भारताची सलामीची जोडी यावेळी काही खास करू शकली नाही आणि 31 धावांच्या भागीदारीनंतर भारताला पहिला धक्का बसला. मात्र, असे असतानाही मयंक अग्रवाल आणि केएल राहुल या सलामीच्या जोडीने एक खास विक्रम आपल्या नावावर केला.
मयंक आणि राहुल या सलामीच्या जोडीने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत कसोटी क्रिकेटमध्ये 200 हून अधिक धावा केल्या आहेत. हा टप्पा गाठणारी ही पहिली भारतीय सलामी जोडी आहे. म्हणजेच दोघांची ही सलामी जोडी आता दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक धावांची भागीदारी करणार्या भारतीय जोडींमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे. यापूर्वी वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरची जोडी अव्वल स्थानावर होती. दक्षिण आफ्रिकेत 4 सामन्यात 184 धावांची सलामी भागीदारी करण्याचा विक्रम गंभीर आणि सेहवागच्या नावावर आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या या दौर्यावर राहुल आणि मयंकच्या जोडीची कामगिरी चांगली झाली आहे. सेंच्युरियन येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातही दोघांनी शतकी भागीदारी केली होती. तिसर्या कसोटीच्या पहिल्या डावानंतर या दोघांमध्ये 5 सामन्यात 220 धावांची सलामीची भागीदारी दक्षिण आफ्रिकेत झाली आहे.
मालिकेतील तिसर्या आणि शेवटच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय डाव 223 धावांवर आटोपला. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने 4 आणि मार्को जॅन्सनने 3 बळी घेतले. कर्णधार विराट कोहली हा एकमेव भारतीय खेळाडू होता ज्याने 50 धावा केल्या.
कोहलीने 79 धावांची खेळी केली. भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेनेही त्यांची एक विकेट गमावली. कर्णधार डीन एल्गर 3 धावा करून जसप्रीत बुमराहचा बळी ठरला. दक्षिण आफ्रिकेने एक गडी बाद 17 धावा केल्या होत्या.