अधिररंजन चौधरी: पक्षाध्यक्षपद सोडण्याच्या कृतीचे समर्थन
कोलकता : जबाबदारीपासून पळ काढत असल्याची टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपबरोबरच स्वपक्षातील काही नेत्यांकडूनही होत आहे. मात्र, भारतीय राजकारणात राहुल यांच्यासारखे नेते दुर्मिळ आहेत, अशा शब्दांत कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते अधिररंजन चौधरी ठामपणे त्यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत.
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसची नामुष्कीजनक पीछेहाट झाली. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राहुल यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांना पक्षाचे हंगामी अध्यक्ष बनवण्यात आले. त्या घडामोडी कॉंग्रेसच्या काही नेत्यांनाही रूचल्या नसल्याचे त्यांच्या प्रतिकूल प्रतिक्रियांवरून स्पष्ट झाले.
त्यापार्श्वभूमीवर, पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना चौधरी यांनी राहुल यांच्या कृतीचे समर्थन केले. राहुल पक्षाध्यक्षपदावर कायम राहिले असते; तर चांगलेच झाले असते. ते परतल्यास आम्हाला आवडेल. मात्र, त्यांच्या निर्णयाचा आदर करायला हवा. पराभवाची जबाबदारी स्वीकारून कुणी पदावरून पायउतार झाल्याचे उदाहरण इतर पक्षात दिसते का? त्याचे उत्तर नाही असेच आहे. राहुल यांनी त्यांच्या कृतीतून एक पायंडा पाडला आहे. त्यांच्या कृतीपासून सगळ्यांनीच शिकायला हवे, अशी भूमिका चौधरी यांनी मांडली.