नवी दिल्ली- सरकारला रोज काही प्रश्न विचारून सतावणाऱ्या राहुल गांधी यांच्यावर भाजपनेही आज पलटवार केला आहे. भाजपने म्हटले आहे की, राहुल गांधी हे संसदेच्या संरक्षण विषयक स्थायी समितीचे सदस्य आहेत, पण त्या समितीच्या एकाही बैठकीला ते उपस्थित राहिलेले नाहीत, पण संरक्षण या विषयावर मात्र ते सरकारला रोज प्रश्न विचारत आहेत.
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी ट्विटरवरूनच ही टीका केली आहे. राहुल गांधी हे रोज नवीन प्रश्न विचारून देशाचे नितीधैर्य खच्ची करीत आहेत, असे नढ्ढा यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी हे देशातील प्रख्यात घराण्याचे वारसदार आहेत. या घराण्याचा संरक्षण विषयक समितीशी काही संबंध येत नाही, पण संरक्षण दलातील कमिशनशी मात्र त्यांचा संबंध येतो, अशी टिप्पणीही नढ्ढा यांनी केली आहे. ते सैनिकांच्या शूरपणावर शंका उपस्थित करणारे प्रश्न उपस्थित करून त्यांचे मनोधैर्य खच्ची करीत आहेत. एका जबाबदार विरोधी पक्ष नेत्याने जे करायला नको आहे ते सर्व प्रकार ते करीत आहेत, असेही नढ्ढा यांनी म्हटले आहे.