नवी दिल्ली – करोना विषाणूची साथ जितकी वाटते तितकी भीषण नाही. परिस्थितीबाबत सरकार भ्रम निर्माण करत आहे. समस्या स्वीकारूनच तिचा मुकाबला केला पाहिजे, असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
“डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने राहुल गांधी यांनी न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि भारतात कोविड उपचारातील परिचारिकांशी साधलेल्या संवादादरम्यान हे मत व्यक्त केले. स्वतःचा जीव धोक्यात घालून या परिचारिका करत असलेल्या रुग्णसेवेच्या कामाचे राहुल गांधी यांनी कौतुक केले आहे. या कोविड योद्ध्यांना उद्देशून राहुल गांधी यांनी “अहिंसक सैन्य’ अशी उपमा दिली आहे.
या परिचारिकांबरोबर संवाद साधताना कोविडच्या वातावरणात काम करताना कौटुंबिक आयुष्यावर कसा परिणाम झाला, याची माहिती राहुल गांधी यांनी घेतली. दिल्लीमध्ये चाचण्यांना परवानगी दिली जात नाही, असा दावा राहुल गांधी यांनी केला. दिल्ली सरकारने घोषणा केल्याप्रमाणे उपचार प्रक्रियेदरम्यान मृत्यू झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वारसांना योग्य भरपाई मिळावी, यासाठी आपण योग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहीण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
चाचण्या न केल्यामुळे रुग्णांना कोठे ठेवायचे, याचा निर्णय घेता येत नाही. त्यामुळे काम करणेच अवघड बसले असल्याचे खासगी रुग्णालयातील डॉक्टरने सांगितले आहे. दोन रुग्णांमध्ये भेद करण्यात अपयश आल्याने डॉक्टरांना नैराश्य यायला लागले आहे. करोनाचे संकट जेवढे वाटते तेवढे वाईट नाही, असे सरकार भासवते आहे. पण संकटाचा सामना करण्यासाठी आगोदर ते स्वीकारायला पाहिजे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
करोनाच्या रुग्णांवर उपचार करताना यापूर्वी दिल्लीतील दोन परिचारिका, एक एक्स-रे तंत्रज्ञ, एक निवृत्त डॉक्टर आणि एका स्वच्छता कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाला आहे. पण त्यांना दिल्ली सरकारने घोषणा केल्याप्रमाणे 1 कोटी रुपयांची भरपाई अद्याप मिळाली नाही. या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी काहीतरी करण्याचे आवाहन एका रुग्णसेवकाने राहुल गांधी यांना केले.