नवी दिल्ली – रेल्वेचे खासगीकरण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली आहे. या निर्णयाबद्दल जनता सरकारला माफ करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. सरकारने आज रेल्वेच्या मार्गावर खासगी उद्योगांना रेल्वे चालवण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. या प्रस्तावानुसार खासगी उद्योगांना 35 वर्षे रेल्वे चालवता येणार आहे.
भारतीय रेल्वे ही देशातील सर्वसामान्य गरीब नागरिकांसाठी “लाईफलाईन’ आहे आणि सरकार रेल्वेला नागरिकांपासून हिरावून घेत आहे. जे काढून घेणे शक्य आहे, ते काढून घ्या. मात्र, जनता सरकारला याबद्दल चोख प्रत्युत्तर दिल्यशिवाय राहणार नाही, असे राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
देशभरातील 109 मार्गांवर खासगी उद्योगांकडून 151 रेल्वेगाड्या चालवण्यासाठी 30 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, असे रेल्वे मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. भारतीय रेल्वेचे देशभरातील जाळे जगभरात सर्वात मोठे मानले जाते आहे. रेल्वेकडे तब्बल 13 हजार रेल्वेगाड्या, 12 लाख कर्मचारी आहेत. या सर्व पसाऱ्यामुळे रेल्वेला अनेक वर्षांपासून तुटीचा व्यवहार करावा लागतो आहे. रेल्वे मंत्रालयाला हा तोटा भरून काढणे अशक्य बनले आहे.