मुंबई – अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली. भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या गुजरातमध्ये यंदा कॉंग्रेस,आप आणि भाजप अशी टक्कर पाहायला मिळाली. भाजपने देखील निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवारांमध्ये महत्वाचे बदल केले होते. त्याअनुषंगाने अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय आहे. गुजरातमध्ये बहुमतासाठी 92 जागा जिंकणे आवश्यक आहे.सुरुवातीच्या कलांनुसार, भाजपा १५० चा आकडा ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपाला कॉंग्रेसचा १९८५ मधील १४९ जागांचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. सध्या भाजपा 123, कॉंग्रेस 22 आणि आप 10 जागांवर आघाडीवर आहे.
अशातच या निकालांचा संदर्भ राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा या निवडणुकांशी जोडला जात आहे, यावर आता संजय राऊत यांनी टीका केली आहे, ते माध्यमांशी बोलतांना म्हणाले राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा या निवडणुकांशी संबंध जोडू नये असं मला वाटतं. राहुल गांधी वेगळ्या मिशनवर आहेत. या निवडणुकांचा संदर्भ त्यांच्या यात्रेशी जोडणं चुकीचं आहे. गेल्या दोन महिन्यांपासून काँग्रेस अंतर्गत आणि इतर राजकारणापासून राहुल गांधी दूर आहेत. ते एक वेगळी मोहिम पुढे नेत आहेत. देश जोडणं, देशातील द्वेष नष्ट करणं, लोकांची मनं जोडणं, संघर्ष थांबवणं यासाठी ती यात्रा आहे आणि त्याला चांगलं यश मिळत आहे, असंही ते म्हणाले.