यात्रेव्दारे सरकारच्या अपयशांचा पाढा वाचला जाणार
नवी दिल्ली : मागील लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी देशातील जनतेशी नाळ जोडण्यासाठी देशव्यापी यात्रा काढणार आहेत. या यात्रेच्या माध्यमातून देशातील भाजप सरकारच्या अपयशांचा पाढा वाचला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आर्थिक आघाडीवर आलेले अपयश आणि सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्द्यावरून सरकारविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी ही यात्रा काढण्यात येणार असल्याचे कॉंग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे.
कॉंग्रेस कार्यकारिणीच्या गेल्या 11 जानेवारीला झालेल्या बैठकीमध्ये या यात्रेबद्दल चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे, असेही या नेत्याने सांगितले. देशव्यापी यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्याकडून देशातील शेतकऱ्यांचे, आदिवासींचे, लघु आणि मध्यम उद्योगांचे, व्यावसायिकांचे प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत.
सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी हे विषय महत्त्वाचे आहेतच. पण त्यापुढे जाऊन पक्षाने देशातील तरुणांना, मध्यमवर्गीयांना, शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना भेडसावणारे प्रश्न मांडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीच ही यात्रा महत्त्वाची असणार आहे, असेही या नेत्याने सांगितले. देशव्यापी यात्रेच्या माध्यमातून तरुणांना पक्षाच्या जवळ आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठीच त्यांच्याशी निगडीत महत्त्वाचे विषय यात्रेवेळी प्राधान्याने मांडले जातील, असे या नेत्याने स्पष्ट केले.
Remarks :