अमेठी – अमेठी हे माझे घर असून मी अमेठी कधीही सोडणार नाही. मी वायनाडमधून खासदार म्हणून निवडूण आलो असलो तरीही अमेठीसाठी दिल्लीत आवाज उठविणार आहे. अमेठीच्या विकासात कोणताही अडथळा येवू देणार नाही, असे कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणूकीत अमेठीतून पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आज प्रथमच येथे भेट दिली. यावेळी त्यांनी अमेठी, जगदीशपुर, तिलोई आणि सलोन आदी ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच शिव मंगेश महाविद्यालयालाही भेट दिली. राहुल म्हणाले, अमेठी लोकसभा मतदारसंघातून माझा पराजय झाला असला तरीही मी येथील जनतेशी कायम बांधील राहणार आहे. अमेठीतील नागरिकांचा पुन्हा विश्वास मिळविणार आहे. त्यांच्यासाठी दिल्लीतही लढणार आहे, असे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बरेच परिश्रम घेतले. पण स्थानिक नेते मतदारांपर्यत पोहचण्यात अपयशी ठरले. त्यामुळे येथे मला अपयशाला सामोरे जावे लागले. परंतु कॉंग्रेस कार्यकर्त्यांनीही परत नव्या जोमाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.
या भेटीनंतर अमेठीचे जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष योगेंद्र मिश्रा आणि चंद्रकांत दुबे यांनी राहुल गांधी यांना पाठिंबा दर्शवित आपल्या पदाचा राजीनामा दिला.
दरम्यान, गांधी कुटुंबीयांचा बालेकिल्ला मानल्या जाणा-या अमेठीत यंदा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा 52 हजार मतांनी पराभव केला होता.