नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांमध्ये ७५ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातच या वाढीनंतर करोनाबाधितांची संख्या आता ३३ लाखांच्या वर गेली आहे. करोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर देशातील जनता लसीच्याही प्रतीक्षेत आहे. यावरून आता काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “आतापर्यंत एक निष्पक्ष आणि सर्वसमावेशक कोविड लसीची रणनीती असायला हवी होती, परंतु अद्याप त्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही,” असे राहुल गांधी म्हणाले.
A fair and inclusive Covid vaccine access strategy should have been in place by now.
But there are still no signs of it.
GOI’s unpreparedness is alarming. https://t.co/AUjumgGjGC
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 27, 2020
केंद्र सरकारचा निष्काळजीपणा चिंताजनक असल्याचे राहुल गांधी म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून सरकारवर हल्लाबोल केला. यापूर्वी त्यांनी १४ ऑगस्ट रोजीही यासंदर्भात ट्विट केलं होतं. “भारत करोना लसीचे उत्पादन करणाऱ्या देशांपैकी एक असेल. परंतु ही लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी एक सर्वसमावेश रणनीती आखायला हवी,” असे राहुल गांधी म्हणाले होते.
जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव, देशभरात अद्यापही झपाट्यानं वाढतच आहे. देशभरात मागील चोवीस तासांमध्ये तब्बल ७५ हजार ७६० नवे करोनाबाधित आढळले असून, १ हजार २३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता ३३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
देशभरातली करोनाबाधितांची एकूण संख्या आता ३३ लाख १० हजार २३५ वर पोहचली आहे. दरम्यान, देशात ७ लाख २५ हजार ९९१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर २५ लाख २३ हजार ७७२ जणांनी आतापर्यंत करोनावर मात केली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत एकू ६० हजार ४७२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.