नवी दिल्ली : कामगार संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पाठिंबा दर्शवत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. मोदी-शहा सरकारच्या जनविरोधी, कामगारविरोधी धोरणांमुळे बेरोजगारीची आपत्तीजनक स्थिती निर्माण झाली आहे.
त्या धोरणांमुळे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या दुबळ्या होत आहेत. त्या कंपन्या मोदी यांच्या भांडवलदार मित्रांना विकण्याचे समर्थन करता यावे यासाठी तसे घडवले जात आहे, असा आरोप राहुल यांनी ट्विटरवरून केला. सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी 25 कोटी कामगारांनी भारत बंद पुकारला. त्या कृतीबद्दल माझा कामगारांना सलाम, असेही राहुल यांनी म्हटले.