भोपाळ – कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे सत्ता मिळवण्यासाठी देशात द्वेषाचे वातावरण निर्माण करीत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर ते भारताची प्रतिमाही मलिन करीत आहेत, असा आरोप ज्येष्ठ भाजप नेते व संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी केला आहे. मध्यप्रदेश सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. राहुल गांधी यांनी भारताची प्रतिष्ठा आणि अभिमानाशी खेळू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
भारतीय सैन्य आणि चीनी लष्कर यांच्यात अलिकडेच झालेल्या चकमकींच्या संबंधात बोलताना ते म्हणाले की, त्या चकमकीत भारतीय सैन्याने शुरता दाखवून चकमकदार कामगिरी केली आहे. पण राहुल गांधी त्यावरूनच प्रश्न उपस्थित करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
ते म्हणाले की, राहुल गांधी यांच्या “भारत जोडो’ या संकल्पनेला अर्थ नाही. कारण भारत कोठेही तुटलेला नाही. तो 1947 सालीच भारत विभाजीत झाला आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधी हे देशात द्वेषाचे वातवरण निर्माण होत असल्याचा दावा करीत आहेत. पण देशात नेमका द्वेष कोण पसरवतो आहे असा सवाल त्यांनी केला.
मोदी देशात द्वेष पसरवण्याचे काम करीत आहेत काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांना हा द्वेष नेमका कोठे दिसला असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. भारतात केवळ द्वेषाचेच वातावरण अस्तित्वात आहेत असा प्रचार करून राहुल गांधी देशाची प्रतिमा खराब करीत आहेत असे ते म्हणाले. राहुल गांधी मोदी आणि भाजपच्या विरोधात समाजात द्वेष भावना निर्माण करीत आहेत असा आरोपही त्यांनी केला.