नवी दिल्ली – देशात लागू करण्यात आलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या कायद्यांच्या विरोधात राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या शेतकऱ्यांच्या मृत्यूसाठी कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार धरले आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करून मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.
नव्या कृषी कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांसोबत सोमवारी पार पडलेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने चर्चेची सातवी फेरी देखील निष्फळ ठरली आहे. आता 8 जानेवारीला पुन्हा चर्चा होणार आहे. शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम असून केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत बैठकीच्या सात फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, तोडगा निघाला नाही. यावरून राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली.
Modi Govt’s apathy & arrogance have claimed lives of over 60 farmers.
Instead of wiping their tears, GOI is busy attacking them with tear gas. Such brutality, just to promote crony capitalists’ business interests.
Repeal the anti-farm laws.#मोदी_सरकार_ज़िद_छोड़ो
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 5, 2021
मोदी सरकारच्या अहंकारामुळे आणि आडमुठे धोरणाने 60 पेक्षा अधिक शेतकर्यांचा जीव घेतल्याची टीका राहुल गांधींनी केली. “मोदी सरकारच्या अहंकाराने 60 पेक्षा अधिक शेतकर्यांचा जीव घेतला आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी सरकार त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा करण्यात व्यस्त आहे. अशा प्रकारची क्रूरता फक्त विशिष्ट भांडवलदारांच्या व्यावसायिक हितसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी असल्याचे राहुल यांनी म्हटले. तसेच कृषीविरोधी कायदे रद्द करा, असं आवाहन त्यांनी केले.
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी “युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड, जनतेवर महागाईचा अत्याचार. शेतकऱ्यांवर मित्रांच्या कायद्यांचा वार, हेच आहे मोदी सरकार” असं म्हणत केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.