लखनौ – सीबीआयच्या दहशतीमुळे मायावती गप्प बसल्या आहेत, उत्तरप्रदेश निवडणुकीपुर्वी आम्ही त्यांना आघाडी करण्याचा प्रस्ताव दिला होता, त्यांना मुख्यमंत्रीपदही ऑफर केले होते पण त्यांच्याकडून उत्तरही आले नाही, असे विधान काल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले होते. त्यावर आज मायावती यांनी जोरदार पलटवार केला आहे. मायावती यांनी म्हटले आहे की राहुल गांधी यांनी आधी आपले घर नीट करावे मगच आमच्याबाबत त्यांनी बोलावे.
आम्ही आमचे सरकार सत्तेवर असताना दलितांच्या उन्नतीसाठी खूप प्रयत्न केला पण कॉंग्रेस सरकारच्या काळात दलितांच्या उत्थानासाठी त्यांनी काहीही केले नाही असा आरोपही त्यांनी केला. आमचे सरकार सत्तेवर असताना कॉंग्रेसने आंदोलने करून आमच्या सरकारच्या कामात अडथळे आणले होते असेही मायावती यांनी म्हटले आहे.
आपण ईडी किंवा सीबीआयच्या दबावामुळे गप्प राहिलो आहोत हा कॉंग्रेसचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. तसेच त्यांनी आपल्याला आघाडीची ऑफर दिली होती त्या दाव्यातही काही तथ्य नाही असे मायावती यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस नेत्यांनी विरोधकांवर कोणताही आरोप करताना त्याविषयी शंभर वेळा विचार केला पाहिजे असेही मायावती यांनी म्हटले आहे. संघ आणि भाजपच्या विरोधात मायावती पुर्ण ताकदीने लढत नाहीत, त्या कारवाईच्या भीतीने गप्प राहिल्या आहेत असे राहुल गांधी यांचे म्हणणे होते.