नवी दिल्ली :- दोन वर्षांची शिक्षा ठोठावले गेलेले कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी तीच चूक पुन्हा एकदा केली आहे. खासदारकी गेल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत राहूल यांनी आपण माफी मागणार नाही; माफी मागायला मी सावरकर नाही,’ असे आणखीच वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नातवाने राहुल यांना सावरकरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात येईल, असे स्पष्टपणे सांगितले आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सावरकर म्हणाले, सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितल्याचे पुरावे राहुल गांधींनी द्यावेत. राहुल गांधी सावरकर नसल्यामुळे माफी मागणार नाही असे सांगत आहेत. मी त्यांना आव्हान देतो की सावरकरांच्या माफीचा कोणताही पुरावा दाखवावा
रणजित सावरकर पुढे म्हणाले, राहुल गांधी राजकारणासाठी सावरकरांचे नाव कसे बदनाम करत आहेत हे पाहून खरोखरच वाईट वाटते. ते मुस्लिमांचेही लांगुलचालन करत आहेत असे दिसते. महाराष्ट्रातही सावरकरांच्या नावावर राजकारण केले जात आहे. सावरकरांचे नाव स्वतःच्या फायद्यासाठी वापरू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे.
त्यांनी पुढे संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा उल्लेख केला. रणजित सावरकर म्हणाले, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना सावरकरांबद्दल आदर असेल, पण जोपर्यंत ते सावरकरांना पाठिंबा दर्शवत नाहीत, तोपर्यंत काही अर्थ नाही. उद्धव ठाकरे यांना खरोखरच सावरकरांबद्दल आदर असेल, तर त्यांनी राहूल गांधींना माफी मागण्यासाठी अल्टीमेटम द्यावा; अन्यथा महाविकास आघाडीतून बाहेर पडावे. त्याचप्रमाणे शरद पवारांनाही सावरकरांबद्दल नितांत आदर आहे, असे समजते. मग त्यांनीही राहुल गांधींना सावरकरांबद्दल केलेल्या आतापर्यंतच्या वक्तव्याबद्दल माफी मागायला सांगावे.