पिंपरी-चिंचवड : लोकसभा असो वा सार्वजनिक कार्यक्रम केंद्रीयमंत्री रामदास आठवले आपल्या कवितांमुळे आणि भाषणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ समाप्त झाला त्या दिवशी आठवले यांनी कविता करून संपूर्ण सभागृहात हास्यकल्लोळ उडवून दिला होता. आता त्यांनी एका पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी गंमतशीर सल्ला दिला आहे.
राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि हम दो हमारे दो याची अंमलबजावणी करावी, असा सल्ला रामदास आठवलेंनी राहुल गांधींना दिलाय. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्ला केला होता. त्यांनी मोदी आणि शाह यांना संबोधून ‘हम दो हमारे दो’ अस म्हणत धारेवर धरले होते. त्यावर बोलताना आठवले म्हणाले, राहुल गांधी यांनी लग्न करावे आणि हम दो हमारे दो याची अंमलबजावणी करावी.
यावेळी आठवले यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा आरक्षणाला आरपीआयचा संपूर्ण पाठिंबा आहे. मात्र त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे. मराठा आरक्षण ओबीसीमध्ये टाकून वाद निर्माण करू नये, असही आठवले यांनी म्हटले आहे.