नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अमेरिकेत बोलताना चुकीचे आणि दिशाभूल करणारे वक्तव्य केल्याबद्दल आणि परदेशात जाऊन देशाची बदनामी केल्याबद्दल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
अमेरिकेत “इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेस’च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या “मुहब्बत की दुकान’या कार्यक्रमामध्ये बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आणि भारतातील सत्तारुढ पक्षावर जोरदार टीका केली होती. परदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दिशाभूल करणारी विधाने केल्याबद्दल राहुल गांधींनी देशातील 140 कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे. पंतप्रधानांबाबतची अशी दिशाभूल करणारी वक्तव्ये देशातील जनता स्वीकारू शकत नाही, असे आठवले म्हणाले.
कॉंग्रेस पक्षाने 6 दशके देशावर राज्य केले. कॉंग्रेस सरकारच्या काळात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याकांसह समाजातील वंचित घटकांच्या कल्याणासाठी केवळ चर्चाच झाल्या. मात्र गेल्या 9 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील “एनडीए’च्या सरकारच्या कार्यकाळात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, मागासलेले, गरीब आणि मजुरांसह समाजातील सर्व घटकांना केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात आला आहे.
उज्ज्वला, मुद्रा योजना, आवास योजना, आयुष्मान योजना इत्यादींच्या माध्यमातून गरिबांना थेट लाभ मिळत आहे. विकासाचा फायदा जनतेला मिळतो आहे, हे राहुल गांधींना पचवता आलेले नाही. पंतप्रधान मोदी हे जगभरातील लोकप्रिय नेते ठरले आहेत. पण कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात खोटा प्रचार करण्याची सवय झाली आहे, असे आठवले यांनी म्हटले आहे.