नवी दिल्ली – मोदी सरकारच्या अपयशामुळेच देशात करोनाची दुसरी लाट आली आहे असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. गेले काही दिवस ते देशात करोनाबाबत जी अनागोंदी निर्माण झाली आहे त्या विषयी ते सातत्याने आवाज उठवत असून काल त्यांनी थेट मोदींना या विषयी पत्रही पाठवले होते.
करोना लसीची विदेशात केली जाणारी निर्यात बंद करा अशी मागणीही त्यांनी या पत्रात केली होती. आज या संबंधात जारी केलेल्या एका ट्विट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारच्याच अपयशामुळे देशात करोनाची दुसरी भयंकर लाट निर्माण झाली आहे. मजुरांवर पुन्हा स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. लसीकरण वाढवण्याबरोबरच स्थलांतरीत मजुरांच्या हातात थेट पैसा देणे गरजेचे आहे.
असे करण्यानेच सामान्य माणसांची स्थिती आणि देशाची अर्थव्यवस्था सुधारू शकते असे त्यांनी म्हटले आहे. तथापि या अहंकारी सरकारला चांगल्या सुचनांवर अंमलच करायचा नाही. त्यांना अशा सुचनांची ऍलर्जी निर्माण झाली आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे.