मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मानहानीच्या खटल्यात दोषी सिद्ध झाल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यांच्यावरील झालेल्या या कारवाईने संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षाने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करण्यास सुरुवात केली. त्यातच महाराष्ट्रातुनही राहुल गांधी यांच्यावरील कारवाईवर प्रतिक्रिया उमटत आहेत. आज शिवसेना (उद्धव ठाकरे) यांच्या सामनामधून राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
आज सामनामधून राहुल गांधी यांच्यावरील कारवाईवर टीका करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्यावरील कारवाई ही भाजपची भ्याडपणाची कारवाई असल्याचे म्हटले आहे. तसेच राहुल गांधी यांनी चोरांना चोर म्हटले यात त्यांचा गुन्हा काय आहे असा सवाल आजच्या सामनामधून विचारण्यात आला आहे. तसेच चोरांना चोर म्हणण्याचे धाडस राहुल गांधींनी दाखवल्यामुळे सत्ताधारी भाजपने त्यांच्यवर कायदेशीर कारवाईची मर्दुमकी दाखवली. सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न राहुल गांधी यांनी कर्नाटकातल्या एका प्रचारसभेत विचारला होता. त्यामुळे ‘मोदीनामा’ची मानहानी झाली असे ठरवून गुजरातमधले एक वेगळेच मोदी सुरत न्यायालयात गेले. तिथे त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली त्यानंतर राहुल गांधी यांनी सत्य हाच माझा ईश्वर असल्याचे म्हटले.
दरम्यान, अग्रलेखात ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा काळ अमृतकाल आहे असं म्हटलं होतं. मात्र याच अमृतकाळात चोरांना चोर म्हटलं म्हणून शिक्षा ठोठावली गेली. चोरांना सजा मिळाली नाही. गौतम अदाणी व मोदी भाई-भाई, देश लुट कर खाई मलई अशा घोषणा संसदेत दणाणत आहेत. दोन आठवड्यांपासून संसद बंद पडली आहे. देश लुटणाऱ्या अदाणींवर कारवाईचे नाव नाही. पण चोरांना चोर म्हटले म्हणून राहुल गांधींवर न्यायालयाच्या खांद्यावरून सत्ताधारी पक्षाने गोळी झाडली आहे. याआधी बदनामीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाल्याचे उदाहरण आपल्या देशात नाही, मात्र राहुल गांधी बदनामी प्रकरणातील खटला अपवाद ठरले आहेत.
“मोदी चोर आहेत असं राहुल गांधी म्हणाले होते, पण ते डरपोकही आहेत हे पुन्हा सिद्ध झाले. अर्थात जी गोष्ट देशाला सांगण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च आला असता ती गोष्ट गुजरातमधील सुरत न्यायालयाने देशभरात फुकटात पोहचवली. माध्यमांवर बंधने आहेत, पण सुरतच्या न्यायालयाने जणू काही ही बंधने हटवून मोदी खरे कोण आहेत? हेच देशाला दाखवले आहे. देशातला भ्रष्टाचार दडपण्यासाठी लोकशाही आणि न्यायय यंत्रणेची केलेली ही मुस्कटदाबी असल्याचा” हल्लाबोल सामनामधून करण्यात आला आहे.